वेदविज्ञानरंजन - ३७
रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ५
जगातील सर्वांत पहिला highway कोणी बांधला?
त्रेतायुगात म्हणजे अंदाजे इ. स. पू. १२,००० वर्षे आधी रामायण घडले अशी मान्यता आहे.
वाल्मीकी रामायणातील अयोध्याकांड सर्ग क्र ८० मध्ये high way कसा बांधला आहे ह्याचे खूप छान वर्णन आहे. राम वनवासात गेल्यावर सर्वानुमते भरताला राज्याभिषेक करावा असे ठरले. त्यावेळी श्रीरामांना भेटण्यासाठी गंगातटापर्यंत जाण्याचे भरत ठरवितो आणि अयोध्येतील सर्व कुशल कारागीरांना अयोध्येपासून गंगातटापर्यंत एक सुंदर राजमार्ग ( high way ) तयार करण्याची आज्ञा देतो. आपण त्यातील निवडक श्लोक पाहू.
अथ भूमिप्रदेशज्ञाः सूत्रकर्मविशारदाः |
स्वकर्माभिरताः शूराः खनका यन्त्रकास्तथा ||१||
कर्मान्तिकाः स्थपतयः पुरुषा यन्त्रकोविदाः तथा वर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ||२ ||
सूपकाराः सुधाकारा वंशकर्मकृतस्तथा |
समर्था ये च द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे ||३ ||
High way तयार करण्यासाठी कोणी कोणी प्रस्थान केले ह्याची माहिती पाहू.
भूमीचे ज्ञान असणारे भूमिप्रदेशज्ञाः (भूशास्त्रज्ञ ) छावणी वगैरे तयार करण्याचे ज्ञान असलेले सूत्रकर्मविशारद, शूरवीर, भूमी खोदणारे, सुरूंग वगैरे बनविणारे खनकाः ह्यांनी पुढे प्रस्थान केले. रामायण काळात सुद्धा आजच्यासारख्या वैज्ञानिक शाखा होत्या की ज्यामध्ये भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रे शिकविली जात असत.
स्थपतयः म्हणजे स्थापत्यशास्त्र जाणणारे वास्तुविशारद तसेच यन्त्रकोविदाः म्हणजे यंत्रांची माहिती उत्तम प्रकारे जाणणारे असे mechanical engineers सुद्धा अयोध्येत होते. त्या सर्वांनी मिळून एकत्र काम करून तो राजमार्ग तयार केला.
बबन्धुर्बन्धनीयांश्च क्षोद्यान् सञ्चुक्षुदुस्तथा |
बिभिदुर्भेदनीयांश्च तांस्तान् देशान् नरास्तदा ||१० ||
जेथे पूल बांधण्यास पाणी आहे तेथे पूल बांधले. म्हणजे रामसेतूच्या आधीच भरताच्या स्थापत्यविशारदांनी पूल बांधले होते. पूल बांधण्याचा तंत्रज्ञान प्राचीन काळापासून भारतीयांना अवगत होते. भरताचे सैन्यदल आणि रथ, हत्ती इत्यादी सर्व त्या पुलावरून व्यवस्थित जाऊ शकेल असा भक्कम पूल बांधायचे ज्ञान अवगत होते.
अचिरेण तु कालेन परिवाहान् बहूदकान् |
चक्रुर्बहुविधाकारान् सागरप्रतिमान् बहून् ||१||
लहान लहान झरे, ज्यांतील पाणी सर्व बाजूंनी वाहत होते त्यांना बांध घालून त्यामध्ये अधिक पाणी साठेल असे तयार केले. म्हणजे धरणे बांधण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. भिन्न भिन्न आकारांची बरीच सरोवरे तयार केली आणि जलाने भरून गेल्यामुळे ती सरोवरे समुद्रासारखी भासू लागली.मोठे मोठे तलाव खोदणे हे यंत्रांशिवाय शक्य नाही. त्याकाळी बुलडोझर सारखी यंत्रे असावीत असे वाटते.
जाह्नवीं तु समासाद्य विविधद्रुमकाननाम् |
शीतलामलपानीयां महामीनसमाकुलाम् || २१ ||
सचन्द्रतारागणमण्डितं यथा |
नभः क्षपायाममलं विराजते |
नरेन्द्रमार्गः स तदा व्यराजत |
क्रमेण रम्यः शुभशिल्पिनिर्मितः |
अनेक प्रकारच्या वृक्षांना सुशोभित, शीतल, निर्मल जलाशयांनी युक्त असलेला तो रमणीय राजमार्ग अत्यंत शोभून दिसत होता. चांगल्या कारागीरांनी (शुभशिल्पिनिर्मितः ) तो निर्माण केला होता.
अलीकडे जेव्हा महामार्ग (high way ) तयार केला जातो त्यावेळी त्या महामार्गावर food-mall, मोठमोठे बगीचे, तारांकित हॉटेल्स तयार केली जातात. त्रेतायुगात असाच राजमार्ग, जो भरताच्या कारागीरांनी तयार केला होता, त्यावर उत्तम सरोवरे, जलाशये, विहीरी आदिंचे बांधकाम केले होते. त्याचप्रमाणे सैन्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा केली होती.
रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती.
ज्यांना ही *लेखमालिका* हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार* ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382*
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण
No comments:
Post a Comment