माझा परिचय

Showing posts with label ध्वनीशास्त्र. Show all posts
Showing posts with label ध्वनीशास्त्र. Show all posts

Thursday, 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - १९ : ध्वनीशास्त्र भाग - ३

 वेदविज्ञानरंजन - १९ : ध्वनीशास्त्र भाग - ३

समर्थ रामदास स्वामी दासबोध १२-२५-८ मध्ये वाणीच्या प्रकाराचे वर्णन करताना म्हणतात -

उन्मेष परा ध्वनि पश्यन्ती | नाद मध्यमा शब्द* *चौथी | वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्ने ||

परा वाणी हे सर्वांत सूक्ष्म असे ॐ काराचे स्फुरण आहे. ते वायुरूप आहे. मणिपूर चक्र हे परावाणीचे उगमस्थान आहे आणि उदान वायू हा त्याच परावाणीचा कारक आहे. उदान वायू हा उर्ध्वदिशेने जाणारा वायू असून त्यापासून अतिसूक्ष्म अशी परावाणी उत्पन्न होते. जेव्हढे सूक्ष्म तेव्हढा त्याचा परिणाम अधिक असतो. हे आपल्याला अणुऊर्जा अभ्यासल्यावर लक्षात येते. ही अतिसूक्ष्म परावाणी सर्वोच्च घोषात परावर्तित होते त्यालाच आपण बेंबीच्या देठापासून ओरडणे असे म्हणतो. बेंबी म्हणजे नाभी जे परावाणीचे उगमस्थान आहे.

आपण वैखरीने जितके बोलतो त्यापेक्षा कितीतरी जास्त संभाषण आतल्या आत करीत असतो आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. समर्थ रामदास स्वामी सांगतात -

पुढे वैखरी राम आधी वदावा

म्हणजे काय? तर वैखरीतून बोलण्याआधी राम शब्दांचा उगम तीन वाणींमधून होतो त्यालाच अजपा असेही म्हणतात. अजपाजप हा शास्त्रातील एक प्रकार आहे. परावाणीद्वारे आपला आत्माच जप करू लागतो म्हणजेच जप करण्याचा विचार मनांत येण्याआधीच जप सुरु होतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |

तसेच अथर्वशीर्षात म्हटले आहे की -

त्वं चत्वारि वाक्पदानि

म्हणजे चारही वाणीचे मूळ तूच (गणपती )आहेस.

श्रीदेवीच्या आरतीत संत नरहरी महाराज म्हणतात - 

चारी श्रमले परंतु न बोलवे काही

ह्यातील चारी श्रमले म्हणजे देवीची स्तुती करून चारही वेद दमले, श्रमले त्याचप्रमाणे परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी ह्या चारही वाणी निःशब्द झाल्या आहेत इतका देवीचा महिमा अगाध आहे. 

सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा महाविस्फोट झाला (Big Bang Theory - नासदीय सूक्त ) त्यावेळी *ॐकारनाद उत्पन्न झाला. मांडूक्य उपनिषदात ॐकारनादाचे वर्णन केले आहे.

ओमित्येतदक्षरमिदं सर्वम् । तस्योपव्याख्यानं* *भूतं भवद् भविष्यदिति ॥

सर्वमोङ्कार एव । यच्चान्यत् त्रिकालातीतं* *तदप्योङ्कार एव ॥ १ ॥

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत  ८ व्या अध्यायात १३ व्या श्लोकात सांगितले आहे की 

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ||

जो माझे नित्य ध्यान करतो आणि मृत्यूसमयी ॐ कार उच्चारण करतो तो *उत्तम गतीला प्राप्त* होतो म्हणजेच त्याला उत्तम गती मिळते. 

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

अ- कार चरणयुगल। उ-कार उदर विशाल।

म-कार महामंडल। मस्तका-कारे॥११॥

हे तिन्ही एकवटले। तेच शब्दव्रह्म कवत्तल।

ते मियां गुरुकृपा नमिले। आदि बीज ॥२०॥

जसे सूर्य किरणांपासून सात रंग तयार होतात तसेच ॐकारनादातून सात स्वर तयार होतात. हाच ॐकारनाद आपल्या नाभीतून म्हणजेच परावाणीतून प्रगट होतो. नाद हा चैतन्यस्वरुप आहे

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जग्दात्मना 

नादो ब्रह्म तदानंदंमन्दिली यमुपास्म्हे ।।

नादोपास्नयादेवा ब्रह्मा विष्णु महेश्वरा:

भवन्त्युपासितानूनं यस्मादेते तादात्मका: ।।

नादब्रह्म हे सर्व प्राणिमात्रांमध्ये चैतन्यस्वरुपात वास करते. ते अतिशय आनंदमय असून ह्याच्या उपासनेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उपासना केल्याचे फळ मिळते. 

संपूर्ण विश्वात नाद, कंपने भरुन राहिली आहेत. 

संगीतरत्नाकर ग्रंथात नादाची महती सांगितलेली आहे. 

न नादेन विना गीतं न नादेन विना स्वरः |

न नादेन विना नृत्यं तस्मान्नादात्मकं जगत् ||

नादाशिवाय गीत नाही, स्वर नाही, नादाशिवाय नृत्यसुद्धा नाही. संपूर्ण जगात नाद व्यापून राहिला आहे. 

पाणिनीयशिक्षा* ह्या ग्रंथात खालील श्लोक वाचावयास मिळतो. 

आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान् मनो युङ्क्ते विवक्षया ।

मनः कायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ॥

मारुतस्तूरसि चरन् मन्द्र्ं जनयति स्वरम् ॥

अष्टौ स्थानानि वर्णानामुरः कण्ठः शिरस्तथा ।

जिह्वामूलं च दन्ताश्च नासिकौष्टौ च तालु च ॥


आता ह्याचा अर्थ पाहू :

आपल्या शरीरातील आत्मा बुद्धीचा उपयोग करून अर्थाची संगती लावतो आणि आपल्या मनाला बोलण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यानंतर जठरामधील अग्नी म्हणजे मणिपूर चक्र असलेला भाग वायूला म्हणजे उदान वायूला प्रेरणा देतो. हा वायू अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र असलेल्या भागात म्हणजे हृदय, कंठ ह्या भागात पसरतो आणि मंद स्वर उत्पन्न करतो. 

उच्चारांची स्थाने आठ आहेत. ती खालीलप्रमाणे :

१. उरः, २. कण्ठः, ३. शिरः (मूर्धा), ४. जिह्वामूलम्, ५. दन्ता, ६. नासिका, ७. ओष्ठौ, ८. तालुः

ध्वनीलहरींच्या ठिकाणी सृजनशक्ती असते. ह्या ध्वनीलहरींचा योग्य तो उपयोग मंत्रशास्त्रात करण्यात येतो. विशिष्ट मंत्र विशिष्ट आघात करून म्हटले असता त्याचे योग्य ते परिणाम दिसून येतात. आपल्या संस्कृतीत मौखिक परंपरा आहे. गुरू कडून शिष्याला सर्व ज्ञान मौखिक परंपरेने देण्यात येत असे. त्यामुळे बारकाव्यासहित सर्व गोष्टी समजण्यास मदत होई. गुरूने शिकवलेले प्रत्येक वाक्य अन् वाक्य लिहून ठेवणे शक्य नसे त्यामुळे मौखिक परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या जुन्या शिक्षण पद्धतीत सुद्धा पाठांतराला खूप महत्व होते. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात घोकंपट्टी - पाठांतर करणे आवश्यक आहे. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बोलू शकतो, ध्वनीमुद्रण ऐकू शकतो. 

आपल्या संस्कृतीत गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देत असत तेव्हा सर्व पुस्तके, ग्रंथ वाचण्यास सांगत नसत. संक्षिप्त स्वरुपात मंत्र तयार करून त्यांची संथा देत जेणेकरून शिष्याच्या मेंदूतील ज्ञान - आकलनक्षमतेची वृद्धी होत असे. एखाद्या ठिकाणी दडलेल्या खजिन्याची चावी मिळाली तर हव्या त्या वस्तू घेता येतात त्याप्रमाणेच *मंत्रशक्तीने कार्य साधत* असे. ह्या सर्वाचा परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी ह्या वाणींशी संबंध आहे.


 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩


प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती. 

ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382* 

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

वेदविज्ञानरंजन - १८ : ध्वनीशास्त्र भाग - २

 वेदविज्ञानरंजन- १८ - ध्वनीशास्त्र भाग - २

आपण  ध्वनीशास्त्र अभ्यासत आहोत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्यांचा अजून विस्तृत अभ्यास करू.

पंडित शारंगदेव (देवगिरी राजाच्या दरबारात ते राजगायक होते ) यांनी साधारण इ. स. १३ व्या शतकात संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला होता. त्यात नादोत्पत्तिक्रमः अध्यायात ते म्हणतात :

आत्मा विवक्षमाणोयं मनः प्रेरयते |
मनः नाभिस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् |
ब्रह्मग्रंथीस्थितो नादः क्रमादूर्ध्वपथे चरन् |
नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भवति स ध्वनिः |


ह्याचे विवेचन पाहू :

आत्मा विवक्षमाणोयं मनः प्रेरयते म्हणजे आत्मा (inner person ) आपल्या मनाला प्रेरणा देतो, उद्युक्त करतो. कशासाठी? तर ध्वनी निर्मितीसाठी.

मनः नाभिस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम्

आणि हे मन काय करते? तर आपल्या नाभीजवळ असलेल्या अग्नीला उत्तेजित करते आणि आणि आल्या शरीरातील वायूला (श्वासोच्छ्वास ) प्रेरणा देते. आपण प्राधान्याने उच्छ्वास सोडताना बोलतो  तुम्ही प्रयोग करून पहा श्वास घेताना बोलणे कठीण असते. उच्छ्वास सोडताना बोलणे सोपे होते.

ब्रह्मग्रंथीस्थितो नादः क्रमादूर्ध्वपथे चरन्

आपल्या शरीरातील अवयवांद्वारे अग्नी आणि वायू यांचा संयोग झालेला नाद उर्ध्व दिशेने येतो आणि स्वरयंत्राशी संयोग पावतो.

नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भवति स ध्वनिः

अशाप्रकारे नाभी, हृदय, कण्ठ, मुख यांद्वारे ध्वनीची निर्मिती होते. म्हणजेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चार पायऱ्यांतून ध्वनी उत्पन्न होतो.

आता आपण ह्याच वाणीच्या चार प्रकारांचा उलट्या क्रमाने अभ्यास करू म्हणजेच वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा

वैखरी शब्दनिष्पत्तिः मध्यमा स्मृतिगोचरा
द्योतिकार्थस्य पश्यंती  सूक्ष्मा ब्रह्मैव केवलम्


वैखरी ही शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते. पण हे शब्द जे मध्यमा वाणीतून येतात त्यांचे उत्पत्तीस्थान काय? तर आपली शब्दसंपदा (Vocabulary) आपली भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द हवे ते आपल्या मेंदूतून, स्मृतीतून येतात म्हणून मध्यमा स्मृतिगोचरा असे म्हटले आहे. आणि कुठले शब्द योजून वाक्य बोलायचे ह्यासाठी योग्य विचार आवश्यक असतो तो विचार म्हणजे द्योतिकार्थस्य पश्यंती. त्यानंतर येणारी परा वाणी जी अत्यंत सूक्ष्म रुपात आपल्या नाभीतून उत्पन्न होते.  थोडक्यात सांगायचे तर शब्द बोलताना शरीरशास्त्र (Biology ) आणि मानसशास्त्र (Psychology) यांचा मेळ जमावयास हवा. तर योग्य प्रकारे आपण बोलू शकतो.

समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या दासबोध ह्या ग्रंथात ह्याच वाणीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.


नाभीपासून उन्मेषवृत्ती |
तेचि परा जाणिजे श्रोती |
ध्वनीरूप पश्यंती हृदयी वसे ||
नाभिस्थानी परावाचा |
तोचि ठाव अंतःकरणाचा |
अंतःकरणपंचकाचा |
निवाडा ऐसा ||


नाभिस्थानी मणिपूर चक्र आहे. तेथे परावाणी प्रगट होते.  हृदयात अनाहत चक्रामध्ये पश्यंती वाणी प्रगट होते. कंठात विशुद्ध चक्रात मध्यमा वाणी प्रगट होते. शेवटी मुखातून वैखरी वाणी प्रगट होते.

पहा किती सुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्या पुरातन वाङ्मयात ध्वनीच्या उत्पत्तीचे वर्णन केले आहे. कुठल्याही परदेशी वैज्ञानिकांनी अश्या प्रकारचे विवेचन ७००-८०० वर्षांपूर्वी केलेली नाही असे मी आवर्जून नमूद करतो.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - १७ : ध्वनीशास्त्र भाग - १

वेदविज्ञानरंजन - १७ : ध्वनीशास्त्र भाग - १

आज आपण ध्वनीशास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या नाभीतून ध्वनी निर्माण होऊन आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. ह्या सर्व प्रक्रियेचे शास्त्रोक्त विवेचन आपल्या  पुरातन ग्रंथांत विद्वानांनी केले आहे. ह्याची माहिती पाहू.

ऋग्वेद मंडल १ - सूक्त क्र १६४ - मंत्र ४५ मध्ये वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे :

च॒त्वारि॒ वाक्परि॑मिता प॒दानि॒ तानि॑ विदुर्ब्राह्म॒णा ये म॑नी॒षिणः॑ ॥

गुहा॒ त्रीणि॒ निहि॑ता॒ नेङ्ग्॑यन्ति तु॒रीयं॑ वा॒चो म॑नु॒ष्या वदन्ति ||

वाचेचे चार प्रकार गणले आहेत, ते सर्व प्रकार जे ज्ञानसंपन्न ब्राह्मण (येथे ब्राह्मण म्हणजे जातीवाचक शब्द नसून ज्ञानी असा अर्थ आहे) आहेत त्यांना ठाऊक असतात. कारण पहिले तीन प्रकार गुप्त आहेत, ते समजण्यांत येत नाहींत, व मनुष्यें बोलतात तो चौथा प्रकार होय

आता ह्याचे सविस्तर विवेचन पाहू :

आता हे वाणीचे चार प्रकार कोणते? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार आहेत.


परा वाणी म्हणजे आपल्या नाभीतून उगम पावलेला ध्वनी. पश्यंती वाणी म्हणजे त्या ध्वनीचा शरीरातील वायूबरोबर झालेला संयोग आणि त्यातून निर्माण झालेली वाणी, मध्यमा वाणी म्हणजे गळ्यातील स्वरयंत्रातून उत्पन्न झालेली वाणी. हे तीन प्रकार आपल्या शरीराच्या आत घडतात त्यामुळे ते लक्षात येत नाहीत.  त्यानंतर जीभ, दात यांच्या मदतीने जी बोलण्याची क्रिया होते, जे शब्द कानी पडतात, तुम्ही आम्ही सर्वजण जे ऐकतो ती वैखरी वाणी होय. ही वैखरी वाणी आपण अनुभवू शकतो आणि ध्वनीमापक यंत्राने मोजता येऊ शकते.

पाणिनी (अंदाजे इ. स. पू. ७०० वर्षे ) हे एक महान व्याकरणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे नियम तयार केले. त्यांनी *शब्द आणि नाद*  ह्यांच्या उत्पत्तीसंदर्भात अतिशय उत्तम विवेचन केले आहे. 

आकाश वायु शरीरात् वक्त्रमुपैति नादः

स्थानान्तरेषु प्रविभाज्यमानो वर्णत्वं आगच्छति यः सः शब्दः ||

आपले शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे. आकाश म्हणजे आपल्या शरीरातील पोकळी वायू म्हणजे आपल्या शरीरातील वायू म्हणजे श्वास आणि उच्छ्वास. जेव्हा ह्यांचा संयोग होतो तेव्हा नाद  तयार होतो. जेव्हा ह्या नादाचे स्थानांतरण होते म्हणजेच स्वरयंत्रातून तो नाद मुखात येतो त्यावेळी त्याचे शब्द तयार होतात आणि मुखावाटे बाहेर पडतात.

नाद, शब्द हे मनोरंजनासाठी उपयुक्त आहेतच पण त्यापुढे जाऊन आपल्याला आत्मरंजनाकडे जावयाचे आहे. म्हणूनच योग साधनेत प्रवीण असलेल्या ऋषीमुनींना ध्यानावस्थेत अनाहत नाद ऐकू येत असे. 

नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्।

उद्धर्तुकामः सनकादिसिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालम् ॥

तांडवनृत्य समाप्त करण्याच्या वेळी नटराजाने म्हणजेच शिवाने सनकादि ऋषी यांची सिद्धी आणि कामना यांच्या पूर्ततेसाठी (ननाद ढक्कां नवपञ्चवारम् ) नऊ आण आणि पाच वेळा आपला डमरू वाजवला.  अशाप्रकारे चौदा वेळा डमरू वाजल्यामुळे  शिवसूत्रांचे जाळे म्हणजे (वर्णमाला) प्रगट झाली. 

ही वर्णमाला खालीलप्रमाणे :

१.अइउण् २. ऋलूक्, ३. एओङ्, ४. ऐऔच् ५. हयवरट् ६. लण् ७. अमङणनम् ८. झभञ् ९. घढधष् १०. जबगडदश् ११. खफछठथ चटतव १२. कपय् १३. शषसर् १४. हल्

ह्याचा अजून एक अर्थ असू शकतो. आपले शरीर म्हणजे डमरू आणि श्वासोच्छ्वास म्हणजे डमरूच्या दोन दोऱ्या. त्यांच्या सहाय्याने आपल्या शरीरात ध्वनीची निर्मिती होते. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...