महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २
यथा *चन्द्रार्कसंयुक्तं* तमस्तदुपलभ्यते |
तद्वच्छरीरसंयुक्तः शरीरीत्युपलभ्यते ||२१||
ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाच्या वेळी ( *चन्द्रार्कसंयुक्तं* ) अर्क म्हणजे सूर्य. चंद्राची सावली सूर्यावर पडते त्यामुळे सूर्य झाकोळला जातो म्हणजेच ती सावली संपूर्ण सूर्याला व्यापून राहते त्याचप्रमाणे आत्मा संपूर्ण शरीराला व्यापून राहतो.
ह्यात सूर्यग्रहणाचा उल्लेख अगदी स्पष्टपणे केलेला आढळतो. नुसते सूर्यग्रहण होते असा उल्लेख करून सोडून दिलेले नाही. तर सूर्य - चंद्र - पृथ्वी ह्यांच्या सावल्यांच्या खेळामुळे ग्रहण होते ह्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आढळते. हिरोडोटस सारख्या पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना पाहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय देण्यात आले आहे. त्यांचा काळ जास्तीत जास्त इ. स. पू. ५०० वर्षे इतका मागे जातो. परंतु महाभारत ज्याचा काळ अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षांपेक्षा अधिक आहे त्याचे नाव कुठेच येत नाही. रामायण जे महाभारताच्या आधीच घडले होते, (त्रेतायुग) ज्याचा काळ अंदाजे इ.स.पू. १२००० वर्षांपेक्षा अधिक आहे ह्यात सुद्धा सूर्यग्रहणाचे उल्लेख आहेत. त्यामुळे आता तरी गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून खरे सत्य जगासमोर मांडणे आवश्यक आहे.
यथा *हिमवतः पार्श्वे पृष्ठं चन्द्रमसो* तथा |
न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता |
मनुष्याला हिमालयाचा दुसरा पार्श्वभाग आणि चंद्राचा दुसरा पृष्ठभाग दिसत नाही परंतु, ह्याचा अर्थ असा होत नाही की हिमालयाला पार्श्वभाग आणि चंद्राला पृष्ठभाग नाही. अशाप्रकारे आत्मा डोळ्यांनी दिसत जरी नसला तरी त्याचे अस्तित्व आहे.
चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएव्हढाच असल्याने चंद्राची कायम एक बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा फक्त ५९% भाग पृथ्वीवरून दिसतो (पृथ्वीसन्मुख भाग ) असे आधुनिक विज्ञान सांगते. दुसरा भाग (पृथ्वीविन्मुख ) पृथ्वीवरून दिसू शकत नाही. आता असे पहा की आधुनिक विज्ञानाने सांगितलेलेच तत्त्व महाभारतात महर्षी व्यासांनी सांगितले आहे. फक्त किती % भाग पृथ्वीवरून दिसतो हे त्यांनी सांगितलेले नाही. आधुनिक विज्ञानाशी संबंधित इतकी अचूक माहिती ज्यांनी लिहिली त्या वेदव्यास ऋषींच्या चरणी आपण नतमस्तक व्हावयास हवे.
महाभारत शांति पर्व अध्याय १५ श्लोक २६ मध्ये सूक्ष्मजीवांचा उल्लेख केला आहे.
सूक्ष्मयोनीनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् |
पक्ष्मणोSपि निपातेन येषां स्यात् स्कन्धपर्ययः ||२६ ||
वरील श्लोकाचा अर्थ आपण पाहू.
असे अनेक सूक्ष्मजीव आहेत की ज्यांना अनुमानाने जाणता येते. मानवाच्या पापण्या लवतात न लवतात तोच ते सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि पुन्हा निर्माण होतात.
सूक्ष्मजीव म्हणजे डोळ्यांना न दिसणारे जीव. फक्त आणि फक्त सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारेच त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. त्यांचे आयुष्य खूपच अल्प म्हणजे काही क्षण किंवा मिनिटांपुरतेच असते असे आधुनिक विज्ञान सांगते. आधुनिक उपकरणांच्या मदतीने हा अभ्यास करता येतो. आजच्या विज्ञानाने सूक्ष्मवांविषयी जी माहिती दिली आहे तेच महाभारतात सांगितले आहे. त्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्र अस्तित्वात नव्हते असे मानले तर इतके अचूक वर्णन व्यास महर्षींनी कसे केले असेल? शिल्पभृगुसंहिता ह्या ग्रंथात दुर्बिण कशी तयार करतात ह्याची माहिती आहे. त्याकाळी दुर्बीण कशी तयार करतात ह्याची माहिती होती तर कदाचित सूक्ष्मदर्शक यंत्राची माहिती असावी असे वाटते. सूक्ष्मजीवांसारख्या विषयाला सुद्धा व्यासांनी स्पर्श केला आह. म्हणूनच म्हणतात की *व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*
आज इथेच थांबतो पुढच्या भागात अजून माहिती वाचूया. तोपर्यंत जयतु वेदविज्ञानम्